बीड : बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम राहिला. दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. प्रशासनाने जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा आणि सिंध्फणा नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरले आहे. रस्ते, पूल आणि मसनवाटा पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून शेतजमिनीवर पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अठरा महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद
जिल्ह्यातील तब्बल अठरा महसूल मंडलात शुक्रवारी रात्री अतिवृष्टी झाली. यामध्ये बीड तालुक्यातील बीड ७३.८ मिमी, पाली ८२.३, पेंडगाव ७३.८, मांजरसुंबा ६६.३ मिमी पावसाची नोंद झाली. पाटोदा तालुक्यातील पाटोदा ७१.५, दासखेड ८६.०, थेरला ११४.५ मिमी पावसाची नोंद झाली असून माजलगाव तालुक्यातील नित्रुड ७०.० मिमी, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर ८४.३, उजनी ७३.८ मिमी, केज तालुक्यातील केज ७४.३, हनुमंत पिंपरी ७७.३, होळ ७७.५ मिमी पाऊस झाला आहे. परळी तालुक्यातील परळी ६८.८, धर्मपुरी ७३.८, नागापूर ७३.०, धारूर तालुक्यातील धारूर ८४.३, तेलगाव ८५.० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
प्रकल्पातून विसर्ग वाढवला
सततच्या पावसामुळे मोठ्या प्रकल्पांचे पाणी पातळी वाढल्याने मांजरा, माजलगाव, सिंध्फणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
धारूर तालुक्यात पूल वाहून गेला
धारूर तालुक्यातील गांवदरा गावाला जोडणारा मुख्य पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे अर्ध्या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत पथके दाखल झाली असून पर्यायी मार्गांची व्यवस्था प्रशासन करत आहे.
जनजीवन विस्कळीत – गावकऱ्यांची चिंता वाढली
जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणी साचल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गावोगावी जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. शेतीमाल वाहून गेला असून जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाची तयारी
जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तहसीलदार, तलाठी, सरपंच यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील काही भागांत बचावकार्य सुरू झाले असून पाण्याखाली गेलेल्या गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








