बीड प्रतिनिधी | Hello Beed न्यूज नेटवर्क
बीड जिल्हा प्रशासनावर आता वचकच राहिलेला नाही, अशा कठोर शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सुनावले. खासदार आणि जनप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी “हे प्रशासन सुस्त झालंय, आता सुतासारखे सरळ करावे लागेल” असा इशारा दिला.
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना अनेक तक्रारी आणि प्रलंबित प्रस्तावांविषयी माहिती मिळाल्याने ते संतप्त झाले.
अजित पवार म्हणाले,
“खासदार, आमदार आणि जनतेच्या मागण्यांकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष द्यावे. एखाद्या पत्राला केराची टोपली दाखवली जात असेल, तर ती गोष्ट सहन केली जाणार नाही. जनतेसाठी प्रशासन आहे, प्रशासनासाठी जनता नाही.”
त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले की, सर्व विभागांनी विकासकामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. “काम न करणारे अधिकारी बीड सोडून जावेत,” असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत काही जनप्रतिनिधींनी सिंचन, आरोग्य, शिक्षण, रस्ते व जिल्हा नियोजन समिती निधी यासंबंधीची कामे प्रलंबित असल्याची तक्रार केली. अजित पवार यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.
ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदेश देतात, पण काही विभाग निष्क्रिय राहतात. अशी स्थिती राहिली तर जबाबदारी ठरवून कारवाई केली जाईल.”
बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, प्रशासनाने जनतेशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी त्वरित सोडवाव्यात आणि शासनाचे निर्णय प्रत्यक्षात उतरावेत, हेच प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे.








