बीड : बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा आज भव्य सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणासाठी हजारो नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादावरून रंगलेले राजकारणही स्पष्ट दिसून आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध पक्षांचे बॅनर, फेस्टून, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे कोणाचे योगदान अधिक, कोणाला श्रेय द्यायचे यावरून राजकीय वातावरण तापले होते.
या सोहळ्यात राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला ठसठशीत भाषणशैलीतून हजेरी लावली. भाषणादरम्यान त्यांनी बीड रेल्वेसाठी अनेक दशकांपासून झालेल्या संघर्षाची आठवण करून दिली आणि श्रेयवादावर भाष्य करताना टोला लगावला. पंकजा म्हणाल्या, “नांगरले कोणी, पेरले कोणी, मशागत कुणी केली आणि कापणीला बजरंग बाप्पा आले” – यावर प्रेक्षकांनी मोठ्या टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
ऐतिहासिक दिवस – बीडकरांच्या स्वप्नपूर्तीची वेळ
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजचा दिवस बीडकरांसाठी ऐतिहासिक आहे. अनेक वर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली जात होती तो क्षण अखेर आला. “मी या जिल्ह्याची मुलगी आहे आणि जिल्ह्याची पालक मंत्री म्हणून सांगते की ही रेल्वे सेवा बीडकरांच्या जीवनात विकासाची नवी पहाट घेऊन येईल,” असे त्या म्हणाल्या.
प्रीतम मुंडेंचे योगदान अधोरेखित
आपल्या भाषणात त्यांनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचाही उल्लेख केला. “प्रीतमताई या दहा वर्ष खासदार राहून जिल्ह्यासाठी सतत प्रयत्नशील होत्या. रेल्वेची ट्रायल रन झाली तेव्हा प्रीतम मुंडे खासदार होत्या. सुरेश प्रभू यांचा सत्कार आम्ही बीडमध्ये केला. त्यामुळे या स्वप्नपूर्तीत त्यांचेही मोठे योगदान आहे,” असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नांची आठवण
पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांचे, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे योगदानही भावुक होत सांगितले. “मुंडे साहेब पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा त्यांनी मोठा निधी आणला. विरोधी बाकांवर बसूनही पाच वर्षात ४५० कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी आणला. त्यांनी विलासराव देशमुखांना पटवून राज्य सरकारला या प्रकल्पासाठी अर्धा वाटा द्यायला भाग पाडले,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, “२०१४ मध्ये मुंडे साहेब केंद्रीय मंत्री झाले. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरु झाले होते, पण त्यांच्या अकाली निधनानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला विशेष बळ दिले. केंद्र सरकारने तब्बल २६०० कोटी रुपये विशेष प्रकल्प म्हणून बीड रेल्वेसाठी दिले.”
श्रेयवादापेक्षा विकास महत्वाचा – पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की ही वेळ श्रेयवादाची नसून विकासाच्या गतीला गती देण्याची आहे. “अनेक नेते, अधिकारी, कार्यकर्ते, सामान्य लोक यांनी वर्षानुवर्षे प्रयत्न केले. ही रेल्वे बीडकरांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आता राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या कामाला लागा,” असे आवाहन त्यांनी केले.
सोहळ्यात कार्यकर्त्यांची उत्स्फूर्तता
आजच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजप, शिंदे गट शिवसेना यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध बॅनर्स, फेस्टून, फोटो यामुळे कार्यक्रमाचे ठिकाण राजकीय रंगमंचासारखे दिसत होते. खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी मोठे बॅनर्स लावून उपस्थिती दर्शवली. गोपीनाथ मुंडे, प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्या छायाचित्रांनी कार्यक्रमस्थळ गजबजून गेले होते.
बीडकरांमध्ये आनंदाचा माहोल
बीडकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा होता. रेल्वेचे उद्घाटन पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. महिलांनी पारंपारिक वेशात स्वागत केले, शाळकरी मुलांनी झेंडे फडकावले. उद्घाटनानंतर पहिल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने गर्दी केली.
पुढील विकासासाठी अपेक्षा
पंकजा मुंडे यांनी पुढे सांगितले की, “रेल्वे आली आहे, आता औद्योगिक विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. या रेल्वेमुळे बीड जिल्ह्याचा व्यापार, उद्योग, शिक्षण, पर्यटन सर्वच क्षेत्रात विकास वेगाने होईल. बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, आता नवे स्वप्न बघू आणि ते पूर्ण करण्यासाठी काम करू,” असे त्या म्हणाल्या.








