बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा रूग्णालयातील कॅथलॅबचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यात त्यांनी कामाच्या गुणवत्तेवरून कंत्राटदारांना चांगलंच फैलावर घेतलं. दरवाजे नीट न बसवणे, रंगकामातील त्रुटी, लाईटची अडचण अशा बाबींवरून त्यांनी अधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली आणि कामात सुधारणा न झाल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला.
बीडच्या रेल्वेवरून माजी खासदारांवर निशाणा
उद्घाटन कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पावर बोलताना माजी खासदारांना टोला लगावला. ते म्हणाले,
“कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या, कितीतरी खासदारांनी आश्वासनं दिली. पण बीडमध्ये रेल्वे काही आली नाही. आम्ही मात्र ठरवलं होतं की रेल्वे आणायचीच. पालकमंत्री झाल्यापासून मी ही जबाबदारी घेतली आणि सरकारच्या माध्यामातून रेल्वे कामाला गती दिली.”
रेल्वे प्रकल्पासाठी १५० कोटींची तरतूद
अजित पवारांनी सांगितलं की सरकारने अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी अर्थ खात्याकडून १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे बीड जिल्ह्याला लवकरच रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.
हा रेल्वेमार्ग बीडच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून प्रवास व मालवाहतुकीसाठी मोठी सोय निर्माण होईल.
कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
कॅथलॅब उद्घाटनावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले की गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कंत्राटदारांना शासन पातळीवरून शिक्षा दिली जाईल.
“मी प्रत्यक्ष साइटला येऊन काम पाहतो. त्यामुळे काम नीट केलं नाही, तर कोणालाही वाचवणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
राजकीय फटकेबाजी आणि विकासाचा संदेश
बीड दौऱ्यात अजित पवार यांनी विकास प्रकल्पांच्या गतीबाबत जनतेला विश्वास दिला आणि विरोधकांना अप्रत्यक्ष टोले लगावत आगामी निवडणुकांसाठी वातावरण तापवलं. बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरू होण्याची घोषणा हा मोठा दिलासादायक निर्णय ठरला आहे.








