हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

बीडला पावसाचा तडाखा! आष्टी तालुक्यात पूरस्थिती, अनेक गावं पाण्याखाली; शाळांना सुट्टी

On: September 16, 2025 5:19 PM
Follow Us:

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पश्चिम भागात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत, पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

गर्भगिरी रांगांवर मुसळधार पाऊस
आष्टी तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगा आणि पश्चिमेकडील गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला. दौलावडगाव घाट, देऊळगाव गौखेल, उंदरखेल परिसरातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे देवळाली, हिवरा सुलेमान, देवळा आणि कडा या गावांमध्ये पाणी शिरले आहे.

कडा गावात ग्रामपंचायतपर्यंत पाणी
कडा गावात पाणी एवढे वाढले की ग्रामपंचायतीच्या इमारतीपर्यंत पाणी पोहोचले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान झाले आहे. गावात वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे.

वाहतूक पूर्णपणे ठप्प
पश्चिम भागातील सर्वच लहान-मोठ्या नद्यांना पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले आहे. नगर-आष्टी रस्ता बंद करण्यात आला आहे. धानोरा येथे कांबळी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे सांडवा वाहू लागला आहे आणि प्रकल्पाच्या वरच्या भागातील उंदरखेल तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. परिणामी या परिसरातील सर्वच रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.

धामणगाव परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने धामणगाव-देवी निमगाव पुलावर पाणी वाहत आहे. त्यामुळे पाथर्डीहून कडा-आष्टीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. शिरा चव्हाण निमगाव आणि शिराळ नदीवरील पाण्यामुळे या रस्त्यांवरही काही काळ वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शाळांना सुट्ट्या, प्रशासन सतर्क
पूरस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने आष्टी तालुक्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. पाणी ओसरेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मदत पथके तैनात करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे.

ड्रोनमधून टिपलेले दृश्य
स्थानिक युवक सागर धोंडे यांनी टिपलेल्या ड्रोन दृश्यांमधून गावांचे भीषण चित्र स्पष्ट दिसत आहे. रस्ते पाण्याखाली गेलेले, पूल पूर्ण भरलेले आणि गावात घरांमध्ये शिरलेले पाणी पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांचे मोठे नुकसान
काही शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे पाण्यात अडकली, अनेक घरगुती वस्तू वाहून गेल्या आहेत. शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
जोरदार पावसामुळे आणखी पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरणाजवळ किंवा नदीकिनारी न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. मदत आवश्यक असल्यास त्वरित तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसाने निर्माण केलेली ही पूरस्थिती तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी संयम बाळगावा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment